*सरकारला पेन्शन धारकांच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील….. कमांडर अशोक राऊत*

भवानीनगर : शनिवार दिनांक १३ जुलै रोजी अजिंक्य मंगल कार्यालय, सातारा रोड, पुणे येथे ईपीएस पेन्शनरांचा मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका पदाधिकारी यांचे सह पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने मेळाव्याची सुरुवात झाली.*राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर राऊत यांनी संघटनेचे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करून पेन्शन प्रश्नी केंद्रीय पातळीवर चालू असलेल्या घटनांची सविस्तर माहिती देवून आपल्या मागण्या लवकरच केंद्रीय पातळीवर मान्य होतील असा विश्वास व्यक्त केला*

देशातील १८४ खाजगी असंघटित क्षेत्रातील ७५ लाख पेन्शनधारकांना (सहकार,जिल्हा बँका,अर्बन बँका,साखर कारखाने, वि.का.सेवा संस्था, दुध संस्था,नागरी पतपेढी, विज महामंडळ, एसटी महामंडळ, खाजगी दवाखाना, औद्योगिक कारखाने, व प्रसार माध्यमातील कर्मचारी/पत्रकार इ.)नां केवळ रु. १०००/- ते ३५००/- इतकी तुटपुंजी फमिली पेन्शन EPS 95 योजने अंतर्गत मिळत आहे. पेन्शनधारकांनी नोकरी कालावधीत दरमहा र ४१७/-,५४१/-,१२५० /- अंशदान पेन्शन फंडात जमा केलेले आहे. प्रत्येक कामगारांची किमान 30 ते 35 वर्षे सेवा झालेली आहे व त्यांचे सेवा काळामध्ये किमान 20 लाख रुपये तरी अंशदान जमा झालेले आहे. यांना त्यांचे अंशदानावरील व्याजरूपी पेन्शन देखील मिळत नाही. असे बाहेर व्याजावर पैसे ठेवले असते तरी त्यांना सध्या मिळणाऱ्या पेंन्शन पेक्षा जास्त व्याज मिळाले असते. असे असताना देखील त्यांना तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. त्यावर त्यांचा गुजराणा तर सोडच शुगर बीपीची औषधे देखील भागत नाहीत. EPS 95 योजने अंतर्गत मिळणाऱ्या तुटपुंजी पेन्शन कमीत कमी रु.७५००/- + म.भत्ता, वैद्यकीय सेवा मोफत इ. मागण्या करीता राष्ट्रीय संघर्ष समितीचे गेली ८ वर्षे पासून केंद्र सरकार/प्रा.फंड कार्यालयाशी पाठपुरावा करीत,आंदोलन,उपोषण, रस्ता रोको, मान्यवरांच्या गाठी भेटी निवेदन देणे द्वारे प्रयत्न चालू आहे. बुलढाणा येथे गेली ८ वर्षे साखळी उपोषण आजतागायत सुरु आहे. याची नोंद घेऊन अनेक माननीय संसद सदस्यांनी लोकसभेत सरकारचे लक्ष वेधले आहे. मथुरेच्या खासदार श्रीमती हेमामालिनी यांचे सहकार्याने मा.पंतप्रधान यांना श्री. अशोक राऊत व पदाधिकारी यांनी २०२१ व २०२२ मध्ये समक्ष भेटून त्यांना माहिती देवून सविस्तर चर्चा केली आहे. त्यांच्याकडून फक्त आश्वासन मिळाले आहे परंतु आजतागायत त्यावर कार्यवाही झालेली दिसत नाही. बराच कालावधी झाल्याने पेन्शनधारक निराश झाले आहेत. यातील 30 टक्के पेन्शनधारक तर देवाघरी गेले आहेत. नैराश्याने वैफल्यग्रस्त पेन्शनधारकांचा स्थितीचा भाग म्हणून राष्ट्रीय संघर्ष समिती समिती देशपातळीवर मेळावे घेत आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीने केंद्र सरकारचे लक्ष वेधन्यासाठी *जंतर मंतर ,दिल्ली* येथे दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी आक्रोश आंदोलन आयोजित केल्याचे सांगून पेन्शनधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे अशोक राऊत यांनी आवाहन केले. संघटना बळकट व आर्थिक सक्षम करणे व संघटनेची एकजूट व बळ दाखविण्याची काळाची गरज असल्याचे श्री. सी.एम्. राऊत अध्यक्ष पुणे जिल्हा समिती यांनी प्रास्ताविकात सांगितले.
मेळाव्यास श्री प्रल्हाद सपकाळ,सौ.सरीता नारखेडे, श्री डी.एम.पाटील, श्री सुभाषराव पोखरकर यांनी समयोचित संबोधन केले सुत्रसंचलन श्री.शंकरराव शेवकर यांनी केले.
मेळाव्यास श्री विजय अण्णा जगताप, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती शोभाताई आरस,नगर जिल्ह्याध्यक्ष श्री संपतराव समिंदर, महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्षा आशाताई शिंदे, इंदापूर तालुका अध्यक्ष प्रकाश शिंदे यांची विशेष उपस्थिती होती.मेळावा यशस्वीस्थेसाठी पुणे जिल्हा समन्वयक श्री अजीतकुमार घाडगे, जिल्हा सचिव श्री बाळासाहेब गावडे, महिला अध्यक्षा श्रीमती पुनमताई गुजर, पिंपरी चिंचवड अध्यक्ष श्री इंद्रसिंग राजपूत, कोषाध्यक्ष श्री पाटील, श्री खटावकर व शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेतले.



