ताज्या घडामोडी
जलजीवन मिशनचे काम रखडल्याने होळ ग्रामस्थ संतप्त; रस्त्यांची दुरवस्था, उपोषणाचा इशारा पत्रकार.उत्तरेश्वर शिंदे.
2024 पासून खोदलेले रस्ते अद्याप न दुरुस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची प्रशासनाकडे मागणी होळ. प्रतिनिधी : केज तालुक्यातील होळ गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेले काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले असून, यामुळे गावातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या संदर्भात होळ येथील रहिवासी व पत्रकार उत्तरेश्वर रघुनाथ शिंदे यांनी उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, होळ गावात जलजीवन मिशनचे काम 2024 पासून सुरू करण्यात आले. पाणीपुरवठा योजनेसाठी गावातील विविध रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये खोदकाम करण्यात आले. मात्र काम अपूर्ण अवस्थेतच सोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू झाल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून नागरिकांना तसेच वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काम पूर्ण करण्याबाबत ग्रामपंचायत आणि संबंधित कंत्राटदारांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र काम रखडल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तसेच जलजीवन मिशनचे उर्वरित काम पूर्ण करून गावात नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात ग्रामपंचायत व कंत्राटदारांकडून परस्परविरोधी माहिती दिली जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने याची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काम तातडीने पूर्ण करून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही तर जलजीवन मिशनच्या फिल्टर केंद्रासमोर उपोषण करण्याचा इशाराही उत्तरेश्वर शिंदे यांनी दिला आहे. बॉक्स न्यूज होळ ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या जलजीवन मिशनचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे. खोदलेले सर्व रस्ते पूर्ववत करून दुरुस्ती करावी. पाणीपुरवठा योजना लवकर सुरू करावी. कामातील दिरंगाईबाबत चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी. ग्रामस्थांना चुकीची माहिती देणाऱ्यांची चौकशी करावी.




