*सगेसोयरे अधिसूचना हरकती / सुचनांची, युद्धपातळीवर छाननी,सुट्टीच्या दिवशी २६६ अधिकारी व कर्मचारी मंत्रालयात तळ ठोकून, सचिव सुमंत भांगे यांच्याकडून आढावा* .

मुंबई :- (सखाराम कुलकर्णी) राज्यात मराठा समाज आरक्षण संदर्भात आंदोलन सुरू असून या बाबत शासनाने सकारात्मक पावले उचलले आहे.शासनाने दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी विशेष अधिवेशन बोलविले आहे. सामाजिक न्याय विभागाकडून देखील युद्धपातळीवर कामकाज करण्यात येत आहे. आज सुट्टीच्या दिवशी २६६ अधिकारी व कर्मचारी यांना त्यासंदर्भातील कामकाजासाठी आदेशित करण्यात आले असून सदर अधिकारी व कर्मचारी मंत्रालयात तळ ठोकून आहेत, उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी हे सगे सोयरे संबंधी प्रसिद्ध अधिसूचनेवरील हरकती, नाहरकती बाबत कामात व्यस्त दिसून आले.
आज शनिवार, उद्या रविवार व सोमवार शिवाजी महाराज यांची जयंती या शासकीय सुट्टीच्या तीनही दिवशी देखील कामकाज सुरु राहणार आहे,

सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम २००० नियम २०१२ मध्ये सगेसोयरे दुरुस्ती करण्यासंदर्भात अधिसुचना दि २६ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. दि १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत त्या बाबत हरकती/ सुचना मागविण्यासाठी मुदत देण्यात आली होती . त्याअनुषगाने सुमारे ३ ते ४ लाख हरकती अंदाजित सामाजिक न्याय विभागाकडे प्राप्त आहेत .त्या सर्व हरकती व दावे ,प्रतिदावे याबाबत प्रत्येक अर्जदाराची माहिती (डाटा) वर्गीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हरकत घेणाऱ्या अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, गाव तालुका जिल्हा यासंबंधीची माहिती संकलित करण्यात येत आहे, त्यामुळे एकाच अर्जदाराने अनेक हरकती घेतले असतील तर सदर बाब देखील या निमित्ताने समोर येणार आहे.
त्या अनुषंगाने आज शनिवार शासकीय सुट्टीच्या दिवशी मंत्रालयातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सामान्य प्रशासन विभाग, अन्न नागरी पुरवठा विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दिव्यांग विभाग यांची कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहेत. सामांजिक न्याय विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे यांच्यासह सामान्य प्रशासन चे सह सचिव खालिद अरब, सामाजिक न्यायाचे सहसचिव दिगंबर बागुल, अन्न नागरी पुरवठा विभाग श्रीमती सारंगी , बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव कैलास साळुंखे , उपसचिव दिनेश चव्हाण, दिव्यांग विभागाचे उपसचिव श्री घोडके, सामाजिक न्याय विभागाचे (वित्त व लेखा) उपसंचालक श्री कल्याण औताडे यांच्यासह संबंधित विभागाचे सह सचिव, उपसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकार यांच्यासह सुमारे २६६ अधिकारी व कार्मचारी यांनी उपस्थितीत राहून कामकाज करीत आहेत .
सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे हे स्वतः मंत्रालयात उपस्थित राहून यासंबंधी सातत्याने आढावा घेत आहे व संपूर्ण कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवून आहे, विशेष म्हणजे या कामकाजावर कोणाचाही तसेच कोणत्याही समाजाचा आक्षेप नको म्हणून हे सर्व प्रक्रिया ही व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे. सुट्टीच्या दिवशी मंत्रालयात उपस्थितीत कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंत्रालयातील भोजनगृह सुरू ठेवण्यात आले असून सामाजिक न्याय विभागामार्फत उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची जेवण ,नास्ता ,चहा , पाण्याची सोय करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शासनाच्या माहीती व तंत्रज्ञान विभाग, गृह विभाग यांच्या समन्वयाने व सहकार्यातून सदर कामकाज होत आहे. तसेच मंत्रालयातील प्रवेशद्वारावरील मध्यवर्ती टपाल कक्ष देखील सुरू ठेवण्यात आला आहे.



