वेदना वाचणारी संवेदना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करा…..! प्रा. डॉ. ज्योती वाघमारे

सोलापूर: – माताजी, पिताजी आणि गुरुजी या थ्रीजीच्या काळात वाढलेल्या पूर्वीच्या मुलांना घडविणे ही कला होती पण आजच्या फोरजी, फाईव्हजीच्या मोहमायेत भरकटत चाललेल्या मुलांना वर्गात रमविणे,घडविणे हे नक्कीच कौशल्य आणि आव्हान असून आजच्या काळातील शिक्षक हे कर्तव्य पूर्ण करतच आहेत.एकवेळ वेद वाचता नाही आले तरी चालेल परंतु समोरच्या व्यक्तीची वेदना वाचणारी संवेदना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून एक परिपूर्ण माणूस शिक्षकांनी घडवावा. शिक्षकांनी वेदना जाणणारे विद्यार्थी घडवावे ‘असे आवाहन शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा.डॉ.ज्योती वाघमारे यांनी केले.
येथील बसवेश्वर विचार मंचच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. बलिदान चौक येथील जैन स्थानकात आयोजित या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. ज्योती वाघमारे या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक डॉ.किरण देशमुख, माजी महापौर शोभा बनशेट्टी, आसावा प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र पवार, स्थानकवासी जैन समाजाचे संचालक पदम राका, गौतम संचेती, राजाभाऊ गांधी, जितू बलदोटा,ॲड.आशुतोष पुरवंत उपस्थित होते.
या समारंभात सुजाता जुगदार, प्रा. डॉ. सौ.वनिता सावंत, प्रा. नागनाथ नवगिरे, सौ.रेखा पेंबर्ती, प्रा.शावरू जडगे,सौ. शुभांगी साठे-काशीद, सौ.शांता चव्हाण,पंडित लोभे, सौ. सुजाता कलशेट्टी,सौ. पूनम ठाकुर,अनिलकुमार गावडे, श्रीशैल गुरव, श्रीकांत कांगडे,अनिल ढवळशंक, सुधाकर कामशेट्टी,उमेश मल्लापुरे यांचा आदर्श शिक्षक तसेच
उपक्रमशील शाळा म्हणून कै. रामगोंडा केंगनाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ,कुमठा नाका सोलापूर,व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडीयम स्कूल, सोलापूर,डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम उर्दू स्कूल, लिमयेवाडी,पीर महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला वांगी आदींचा नगरसेवक डॉ. किरण देशमुख व प्रा. डॉ.ज्योती वाघमारे यांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
आजचा पुरस्कार हा शिक्षक नेते कै.बाबासाहेब काळे यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला. मंचचे अध्यक्ष मल्लेश पुरवंत यांनी प्रास्ताविक केले. अतिथींचा सत्कार सौ शैलजा पुरवंत, नागेश्वरी भागानगरे यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी रानसर्जे यांनी केला तर आभार सचिन मोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आप्पा चव्हाण,मल्लू बिराजदार,सलीम पाटील, धनराज वट्टे,शिवानंद विभुते यांनी परिश्रम घेतले.



