बाल भवन चा २० वा वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा”……..
तळेगावच्या कलापिनी बालभवनचा २०वा वर्धापन दिन अगदी जल्लोषात साजरा झाला.
“बाल भवन चा २० वा वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा”……..Bal Bhavan’s 20th Anniversary Celebrated With Fanfare”……..
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर. ११ मार्च.

तळेगावच्या कलापिनी बालभवनचा २०वा वर्धापन दिन अगदी जल्लोषात साजरा झाला.या कार्यक्रमासाठी, संगीता गोखले आणिउर्मिला बासरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मंचावर कलापिनीचे विश्वस्त डॉक्टर अनंत परांजपे, अश्विनी परांजपे , कार्याध्यक्ष अंजली सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्ष. अशोक बकरे आणि स्वास्थ्य योगाच्या. रश्मी पांढरे उपस्थित होत्या.
पाहुण्यांच्या हस्ते नटराज पूजन करून श्लोक म्हणत कार्यक्रमाची सुरुवात झाली.मा. गोखले ताईंनी मुलांना छान गोष्ट सांगितली. वीस वर्षांपासून अविरत बालभवन सुरू आहे त्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि बालभवनला शुभेच्छा दिल्या. सामान्यांना असामान्य करण्याची कला कलापिनीला अवगत आहे असे त्या म्हणाल्या.मा. उर्मिला बासरकर यांनी मुलांना दानाचे महत्त्व पटवून देणारी गोष्ट सांगितली. मुलांना घडवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे त्यांनी त्यांच्या बालवाडीच्या स्वानुभवावरून सांगितले. आज काल मुलं इंग्रजी शाळेत जात असताना सुद्धा बाल भवन मध्ये येऊन मराठी गाणी, गोष्टी, श्लोक उत्तमरीत्या म्हणतात याचे त्यांनी कौतुक केले आणि बालभवनला शुभेच्छा दिल्या.
कलापिनीचे विश्वस्त डॉ.परांजपे यांनी मुलांसाठी बालभवन किती गरजेचे आहे याचे महत्त्व सांगितले. आज घराघरात मुलं एकटी आहेत त्यांच्याशी खेळायला ,बोलायला कोणी नाही, गोष्टी सांगायला आजी ,आजोबा नाही, अशाने मुलं हुशार असली, त्यांचा बुद्ध्यांक कितीही चांगला असला तरी भावनांक मात्र अजिबात नसतो आणि म्हणून मुलं जगाच्या पाठीवर कमी पडतात. मुलांनी एकमेकांशी कसं वागावं, शेअरिंग कसं करावं हे त्यांना अभ्यासा आधी शिकवण किती गरजेचं आहे हे सांगितलं.
वर्धापन दिनानिमित्त मुलांनी विविध गुणदर्शन केले. गाण्यावर व्यायाम करणे किती सहज सोपे आहे हे मुलांनी आपल्या हालचाली मधून सुंदर प्रकारे दाखवले. त्यानंतर गणपती आपला कसा मित्र आहे आणि त्याने कायम आपल्या सोबत राहावं अशी प्रेमळ साथ घालत ओ माय फ्रेंड गणेशा या गाण्यावर सादर केलेलं नृत्य प्रेक्षकांना खूपच आवडलं.
पालक मंचाच्या महिलांनी सुद्धा कार्यक्रमाला साजेस छान नृत्य सादर केलं. एक होता चिंकू आणि चट चट चटणी ही बडबड गीते ही मुलांनी छान केली. गाडी मे झननन झननन या गाण्यात भारतातील विविध प्रांतातील प्रवासी दाखवून विविधतेतून एकता उत्तम दाखवली. या गाण्याला सुद्धा प्रेक्षकांची भरपूर दाद मिळाली. त्यानंतर आपल्या रोजच्या वापरातील केळी, चिंच आंबा ,बेल ,अळू ,तुळस ,आपटा आणि विड्याचे पान यांनी अतिशय सुंदर प्रकारे आपापले महत्त्व सांगितले.
कुमार भवनच्या नारद झाला गारद या नाटकाने तर धमाल उडवून दिली. यातील पेंदया आणि नारदाने तर प्रेक्षकांची मने जिंकली. या नाटकाचे दिग्दर्शन संदीप मनवरे आणि विद्या अडसुळे यांनी केले होते. त्यांना मार्गदर्शन अंजली सहस्त्रबुद्धे यांनी केले. अविनाश शिंदे यांनी संगीत साथ केली तर दिपाली जोशी ,राखी भालेराव आणि योगेश वैद्य यांनी सहकार्य केलं.



