केएलई मंगरूळे प्रशालेत शालेय पोषण आहारात दहा वर्षापासून भ्रष्टाचार,चौदा लाख चौतीस हजाराचा भ्रष्टाचार सिध्द….!.
शासनाची लाखों रुपयांची फसवणूक, मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्याची मागणी

अक्कलकोट:- (प्रतिनिधी राजशेखर पवार) दि,७_येथील प्रतिष्ठित केएलई मंगरुळे प्रशालेत गेल्या दहा वर्षापासून सलग शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार सुरू होता.त्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी शासन नियुक्त त्री सदस्य समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने कसून चौकशी करून दोन महिन्यापूर्वी अहवाल सादर केला त्यामध्ये चौदा लाख चौतीस हजाराचा भ्रष्टाचार सिद्ध झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांनी संबंधित शाळेचा तत्कालीन मुख्याध्यापक,संस्थेकडून आणि हिशोब लिहिणाऱ्या शिक्षकाकडून वसूल करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
शासनाचा आदेश डावलून स्थानिक अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन विनाअनुदानित तुकड्या मधील सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांना सलग दहा वर्षे शासनाची दिशाभूल करून शालेय पोषण आहार लाटण्याचे काम सुरू होते.तत्कालीन मुख्याध्यापक गिरीष बसवराज पट्टेद यांनी शालेय पोषण आहाराच्या ठेकेदाराशी संगनमताने फार मोठा गैरव्यवहार केलेला आहे.शासनाचे सुमारे पंचवीस ते तीस लाखाची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.विनाअनुदानित वर्गांना शालेय पोषण आहार देय नसल्याचे स्पष्ट आदेश असताना स्थानिक अधिकाऱ्यांना आर्थिक लाभ देऊन आत्तापर्यंत शालेय पोषण आहार लाटण्याचे काम पट्टद् यांनी केले आहे.कहर म्हणजे संस्थेने आपल्याला असे करण्यास सांगितल्याचे पट्टद् यांनी चौकशी अधिकाऱ्यापुढे सांगितले आहे.
त्यामुळे संस्थेचे काही पदाधिकारी विनाकारण चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.याच संस्थेच्या बार्शी येथील शाळेने दोन वर्षांपूर्वी शालेय पोषण आहार प्रकरणातील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना धरून दडपले होते.त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते स्वामीनाथ हरवाळकर यांनी सर्व पुरावे प्राथमिक चे शिक्षणाधिकारी संजय जावीर आणि शालेय पोषण आहाराचे जिल्ह्याचे लेखाधिकारी वैभव राऊत यांच्याकडे सुपूर्त केले होते. त्यांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन शासकीय चौकशी समिती नियुक्त केली होती.चौकशी समितीचे प्रमुख मयूर पाटील,दक्षिणचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे,अक्कलकोटचे पंचायत समिती शालेय पोषण आहार अधीक्षक हरीष गायकवाड यांनी अनेक वेळा शालेय पोषण आहाराचे दप्तर तपासले होते.त्यामध्ये माजी मुख्याध्यापक पट्टेद यांनी भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाल्याने दंड वसुलात आणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार स्वामीनाथ हरवाळकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्याकडे केले आहे.हा संपूर्ण भ्रष्टाचार माजी मुख्याध्यापक पट्टेद यांनी केला असून या भ्रष्टाचाराशी संस्थेचे काहीही संबंध नसल्याचे हरवाळकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रातला शालेय पोषण आहारातला हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.



