गणेशोत्सवात भाजप महिला मोर्चाचे सरकारविरोधात साकडे आंदोलन
ठाकरे सरकारला महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सुबुद्धी दे
पुणे : राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपा महिला मोर्चा राज्यात गणेशोत्सव काळात ठाकरे सरकार विरोधात साकडे आंदोलन करणार आहे.
महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार सुरू असून सरकारच्या दबावामुळे पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करण्याची हिंमत करत नाही म्हणून महिलांनाच आपल्या संरक्षणाची तयारी करावी लागणार आहे असे भाजपा महिला मोर्चाने म्हटले आहे.
घरकोंबड्या सरकारमुळेच वाढले अत्याचार –
कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांवरही अत्याचार झाले. अशा वाढत्या घटनांमुळे महिलांना घराबाहेर पडण्याची भीती वाटू लागली आहे. जनतेने घरात बसावे अशी ठाकरे सरकारची इच्छा असली तरी त्यासाठी रस्त्यावरील गुन्हेगारास पाठीशी घालून दहशत माजवणे हा मार्ग नाही. घरबसल्या राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे पहात निष्क्रिय राहिलेल्या ठाकरे सरकारला आता गणरायाने बुद्धी द्यावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चा करणार आहे.
गणरायाच्या मुखदर्शनावरही बंदी घालणारे सरकार सण आणि उत्सव यांचा तिरस्कार करते हे सिद्ध झाले आहे. घरात बसून स्वतः तोंड लपविणा-या मुख्यमंत्र्यांचा देवाच्या मुखदर्शनाला विरोध का? असा सवाल भाजप महिला मोर्चाने केला आहे.



