आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्यांना धडा शिकवा – खताळ महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी निमोण-तळेगावकरांना दिला सल्ला

संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर तालुक्यातील निमोण-तळेगाव परिसरातील लोकांना पाणी समस्या भेडसावत असून, या भागाला भोजापुर धरणाचे पाणी माजी मंत्री स्व. बी. जे. खताळ यांच्या प्रयत्नांतून मिळाले होते. मात्र, गेली ४० वर्षे तालुक्याच्या सत्तेत असणाऱ्यांनी खऱ्या अर्थाने या भागातील जनतेला पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी केला आहे. तालुक्यातील जलसमस्या सोडविण्याचे आश्वासन देत त्यांनी नागरिकांना आता परिवर्तन घडविण्याचा सल्ला दिला. खताळ यांनी निमोण येथे आयोजित कॉर्नर सभेत बोलताना म्हटले की, “तळेगाव-निमोण परिसराला पाण्यापासून कायमच वंचित ठेवले गेले आहे. भोजापुर व निळवंडे प्रकल्पांच्या नावाखाली फक्त फसवणूक केली गेली असून पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. जर मला पाच वर्षे संधी दिली, तर मी हा पाण्याचा प्रश्न महायुती सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचे वचन देतो. या आश्वासनानुसार, जर मी पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर या भागात फिरकणार सुद्धा नाही.” सभा आणि उपस्थित मान्यवर या सभेला ज्येष्ठ नेते विष्णू घुगे यांच्या अध्यक्षतेखालीत, भाजप आणि शिवसेनेचे स्थानिक नेते, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातील निमोण गटातील समनापूर, सुकेवाडी, कुरण, खांजापूर, मालदाड, सोनोशी, नान्नज, पारे गाव, क-हे, पळसखेडे, निमोण, पिंपळे, चिंचोलीगुरव, देवकवठे, काकडवाडी, पारे गाव खुर्द, पोखरी, हवेली येथील मतदारांशी खताळ यांनी संवाद साधला. खताळ यांनी सांगितले की, यापूर्वी तालुक्यातील सत्ताधारी नेत्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत निष्क्रियता दाखवली. भोजापुर प्रकल्पातून मिळणारे पाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी कोणताही ठोस प्रयत्न केला नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हा बदल घडविण्यासाठी नागरिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले. स्थानीकांची मदत आणि साथ महायुतीचे उमेदवार असलेल्या अमोल खताळ यांना नागरिकांची मदत मिळत असून, विविध गावांतील ग्रामस्थांनी आपल्या ऐपतीप्रमाणे आर्थिक सहाय्य केले आहे. मालदाडचे सेवानिवृत्त शिक्षक बाळासाहेब मारुती नवले यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश तर निमोणमधील महिलांनी लाडक्या बहिणींना मिळालेल्या पैशांमधून ‘फुलन फुलाची पाकळी’ म्हणून मदत केली आहे. निमोण गावात शिवसेना-भाजप समर्थक महिलांनी १००, २००, ५०० रुपये देऊन आर्थिक मदत करत खताळ यांना पाठींबा दिला आहे. अदृश्य हात माझ्या बरोबर आहे - खताळ खताळ यांनी सांगितले की, संगमनेर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे आणि काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांचे अदृश्य हात त्यांच्या पाठीशी आहेत, ज्याचा प्रभाव मतदानाच्या दिवशी दिसून येईल. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीच्या पाठबळावर समाधान अमोल खताळ यांनी सभेत बोलताना सांगितले की, त्यांच्या पाठीशी महायुतीची संपूर्ण ताकद असून, विकासाच्या ध्येयासाठी ते कटिबद्ध आहेत. पाणीप्रश्न सोडवणे हा त्यांच्या अजेंड्याचा प्रमुख मुद्दा असून, या कामात त्यांना राज्य आणि केंद्र सरकारची पूर्ण मदत मिळेल. पाण्याच्या समस्येसाठी त्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

Spread the love

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!