आरोग्यम् धनसंपदा- आरोग्य दोन प्रकारचे आहेत..
एक वैयक्तिक आणि दुसरं आहे सामाजिक ! हे दोघेही अनमोल आहेत!
आरोग्यम् धनसंपदा- आरोग्य दोन प्रकारचे आहेत– एक वैयक्तिक आणि दुसरं आहे सामाजिक ! हे दोघेही अनमोल आहेत.
आवाज न्यूज : विशेष लेख, २१ फेब्रुवारी.

आपलं वैयक्तिक — शारीरिक – मानसिक आरोग्य बिघडलं तर त्याची काळजी निश्चितच आपले डॉक्टर घेतात ! पण- आपल्याच समाजाचं आरोग्य बिघडलं तर ? म्हणजे- जेव्हा समाज जीवनाचा तोल ढळतो. नीतीचा ऱ्हास होतो आणि माणसाचा पशु होतो ! तेव्हा निश्चितच समजाव की आपल्या समाजाच आरोग्य धोक्यात आहे ! अशावेळी समाजाला सावरणारा कोणीतरी महात्मा प्रगट व्हावा लागतो ! त्याच्या पावलांनी तयार होणारी वाट-लोक जीवनात नव्या जाणिवांची पहाट घेऊन येते ! चला तर मग त्या संदर्भात थोडा संवाद साधूया–मित्रांनो एखाद्या व्यक्ती च आरोग्य बिघडले तर त्या व्यक्तीवर डॉक्टर योग्य तो औषध उपचार करतात आणि त्याला निश्चितच बर करतात. परंतु जेव्हा समाजाच आरोग्य बिघडतं, तेव्हा त्याच्यावर कोणत्या प्रकारे आणि आपण कसा औषधोपचार करणार??
याच उत्तर एकच आहे, समाजातील प्रत्येक व्यक्तिमत्वाला योग्य ती दिशा दाखवणे, त्याचा संस्कारातून मानसिक विकास करणे, आणि त्यातून निकोप निरोगी आर्थिक सामाजिक मानसिक दृष्टीने त्या समाजाला समृद्ध करणे !! हे प्रथम आपलं ध्येय ठरवलं पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने अथक प्रयत्न करण आवश्यक आहे. अर्थात त्यासाठी योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शक भेटण हे हि तितकच आवश्यक आहे!!! आता ते कसे भेटतील यासाठी समाजसुधारक प्रतिभावंत हे त्या त्या काळात निश्चितच आपल कर्तव्य आणि सहभाग करीत आलेले आहेत.
उदाहरणार्थ, एकच प्याला या नाटकातून मद्यपी माणसाची झालेली सुधाकर या नाटकातील नायकाची झालेली दुर्दशा… आपल्या समाजाने पाहिली आहे. नटसम्राट या नाटकातून “जेवणाचं ताट द्याव पण बसण्याचा पाट देऊ नये” हा संदेश देण्यात नाटककार, कलाकार आणि दिग्दर्शक यशस्वी झालेत. सैराट या सिनेमातून “समाजाच्या प्रवाहाविरुद्ध कृती केल्यास त्याचे विदारक परिणाम कसे होऊ शकतात याचं मूर्तिमंत दर्शन त्या सिनेमाने समाजाला घडवलं!”, दूरदर्शन वरील अनेक वाहिन्या कळत-नकळत समाजपरिवर्तनाच काम करीत असतात थोडक्यात वृत्तपत्र नाटक-सिनेमा दूरदर्शन हे जे माध्यम आहे ते समाजपरिवर्तनाचं काम आपापल्या परीने करीतच आहेत.
आजच्या स्पर्धेच्या युगात समाजातील प्रत्येक जण भरडला जाऊन, अशांत झालेला आहे आणि हळूहळू त्याचा एक समूह तयार होतो आहे! आणि त्याचा संताप अनावर झाला की निश्चितच त्याच रूपांतर दंगलीत होतो आणि मग वैयक्तिक, शाब्दिक बाचाबाचीतून त्याचं रूपांतर विध्वंसक मारामारीत कस आणि केव्हा होतं तेही आपल्याला कळत नाही… मग यातून मार्ग कसा काढायचा???
म्हणूनच उपाय कठीण असला तरी तो आता आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येकाने हे ठरवलं पाहिजे की मला आणि माझ्या परिवाराला मिळालेले जीवन हे अमूल्य आहे “क्युकी जिंदगी ना मिलेगी दोबारा”हे शाश्वत सत्य जाणून पुढच्यास ठेच मागचा शहाणा हा अनुभव गाठीशी ठेवून, आजूबाजूला डोळसपणे बघून, संस्काराच्या माध्यमातून संतापावर संयमाने मात करायला प्रत्येकाने शिकलं पाहिजे! एकदा ही भूमिका आपण मनापासून स्वीकारली की आपोआपच आपल्या बोलण्यात, वागण्यात आणि आपण देत असलेल्या प्रतिसादात नम्रतेचा प्रवेश होतो! आणि मित्रांनो सर्व गुणांचा राजा “नम्रता” हा असा गुण आहे कि तो समोरच्याला निश्चितपणे जिंकण्यात यशस्वी होतो. अत्यंत सुदृढ, निरोगी समाज निर्माण करण्याची सुरुवात आजच आपल्यापासून आपण करूया… लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी.



