“मावळभूषण” कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे इंद्रायणी विद्या मंदिर, संस्थेच्या वतीने आयोजन.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने संस्थेचे माजी अध्यक्ष, शिक्षणमहर्षी माजी आमदार, 'मावळभूषण. कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे दि. १३ ते दि. १५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सायंकाळी ४.३० वा. इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुशोभित भव्य प्रांगणामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे.
“मावळभूषण” कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजन.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ११ फेब्रुवारी.

तळेगाव दाभाडे: इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने संस्थेचे माजी अध्यक्ष, शिक्षणमहर्षी माजी आमदार, ‘मावळभूषण. कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे दि. १३ ते दि. १५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सायंकाळी ४.३० वा. इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुशोभित भव्य प्रांगणामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे. मा. कृष्णरावजी भेगडे साहेब हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक सहिष्णू आणि पुरोगामी विचारांचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून मावळच नव्हे तर महाराष्ट्रात आपले योगदान दिलेले आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व या विचारांचा सामाजिक वारसा जपण्याच्या उदात्त हेतूने ‘मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला आयोजित करीत आहोत.


सोमवार दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी नामवंत साहित्यिक मा. विश्वास पाटील उद्घाटनाचे पहिले पुष्प गुंफणार असून ‘पानिपत, चंद्रमुखी ते महासम्राट शिवाजी’ असा आपल्या कादंबरी लेखनाचा प्रवास ते श्रोत्यांना उलगडून सांगणार आहेत.

मंगळवार दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुस-या पुष्पामध्ये भारतातील विज्ञान व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ख्यातनाम विचारवंत व लेखक मा. अच्चुत गोडबोले हे ‘बदले तंत्रज्ञान आणि उदयाचे जग’ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. आपल्या विज्ञान तंत्रज्ञानातील लेखनामुळे देश- विदेशात नावाजलेले अच्चुत गोलबोले यांचे सदरचे व्याख्यान तळेगावकरांसाठी पर्वणी ठरणार आहे.

बुधवार दि. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनयजी सहस्त्रबुध्दे समारोपाचे पुष्प गुंफणार आहेत. परराष्ट्र खात्याच्या अंतर्गत येणा-या सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले असून वैचारिक आणि समग्र विकासात्मक राजकीय मांडणीसाठी सहस्त्रबुध्दे यांचा नावलौकीक आहे. ‘भारताची सौम्य संपदा’ विषयासंदर्भात त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेमार्फत यंदाचे हे व्याख्यानमालेचे ८ वे वर्ष असून यापूर्वी , उत्तम कांबळे, विजय कुवळेकर, डॉ. जनार्धन वाघमारे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीनिवास पाटील, हनुमंतराव गायकवाड यांसारख्या मान्यवरांनी विचार मांडलेले आहेत. समकालीन वैविध्यपूर्ण विषयांना न्याय देण्यासाठी त्या दर्जाचे व्याख्याते बोलावून समाज प्रबोधनासाठी अग्रेसर असलेल्या या वैशिष्टयपूर्ण व्याख्यानमालेस या पुर्वी अनेक • विचारवंतांची उपस्थिती लाभलेली आहे.
संस्थेच्या वतीने सदर व्याख्यानमालेसाठी तळेगाव व मावळ तालुक्यातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व पालक, नागरिक बंधु भगिनी यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष. रामदास काकडे, कार्यवाह. चंद्रकांत शेटे, खजिनदार व संयोजन समितीचे अध्यक्ष. शैलेशभाई शहा व संयोजक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले आहे.



