संतोष खांडगे यांचा 12 जून हा जन्मदिवस. त्यानिमित्त मिलिंद शेलार यांचा हा विशेष लेख…
आवाज न्यूज: श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव, रोटरी क्लबसह विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे संतोष खांडगे यांचा 12 जून हा जन्मदिवस. त्यानिमित्त मिलिंद शेलार यांचा हा विशेष लेख…
संतोष खांडगे: मावळचा अष्टपैलू हिरा शायर जां निसार अख्तर यांनी जीवनाचा सुंदर अर्थ उलगडून दाखवताना चार ओळी लिहिल्या आहेत…..
फुर्सतेकार फकत चार घडी है यारो । ये ना सोचो के अभी उम्र पडी है यारो ।।
अपने तारिकी मकानो से तो बाहर झाँको । जिंदगी शमा लिए दर पे खडी है यारो ।। – जां निसार अख्तर
जीवन जगत असताना चांगले कर्म करायचं असेल तर त्यासाठी खूप कमी वेळ असतो. आपण जर ‘चांगली कामं करायला आणखी खूप आयुष्य बाकी आहे,’ असंच म्हणत बसलो तर आपल्या हातून चांगलं काम कसं होणार? आपण आपल्या सुंदर महालातून, घरातून बाहेर डोकावून तरी पहा… तिथं तुम्हाला आयुष्यरुपी, एक शांत.. प्रकाशित मेणबत्ती आपली वाट पहात असलेली दिसेल.
तीच मेणबत्ती आपल्या हातात घेऊन आपल्याला पुढं जायच
संतोषजी म्हणजे एक भावनाशील, शांत, संयमी, निगर्वी व धाडसी व्यक्तीमत्व. समाजामध्ये जर परिवर्तन घडवून आणायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि या संस्थेअंतर्गत स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल सुरू केले. शिक्षण हे काळाची गरज आहे तर इंग्रजी ही वाघिणीचे दूध व आंतरराष्ट्रीय संपर्क माध्यम आहे. या बाबींचा विचार करता त्यांनी या शाळेची स्थापना केली. आज या शाळेचे रुपांतर महाकाय वटवृक्षामध्ये होऊ पहात आहे. या संस्थेचे अध्यक्ष असूनही त्यांनी कधीही संस्थेतील पदाधिकारी व शाळेमध्ये राबणारे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांवर आपल्या अधिकाराचा रुबाब गाजवला नाही. त्यांच्या स्वभावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते सामान्यातील सामान्य माणसांमध्येही सहज मिसळतात. त्यांच्याशी एकरुप होतात. विशिष्ट उंचीवर पोहोचल्यावर सहज खाली झेपावणं..तिथं रमणं आणि पुन्हा आपल्या उंचीवर पोहोचणं हे सर्वांनाच सहज जमत नाही.
संतोषजी मात्र याला अपवाद आहेत. ते सहज सर्वांमध्ये मिसळतात.
कोणतीही सन्माननीय व्यक्ती एका रात्रीत आदरास पात्र ठरत नाही. त्यासाठी लहानपणापासूनच बीजारोपण होत असतं. संतोषजींबाबतही असंच काहीसं घडलं. आजची त्यांची सामाजिक, राजकीय क्षेत्रातील यशस्वी वाटचाल ही अशीच लहानपणापासूनच सुरू झाली म्हणायला हरकत नाही. अगदी महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचे नेतृत्व गुण बहरू लागले. महाविद्यालयात सीआर, पुणे विद्यापीठामध्ये युआर ही पदं त्यांनी सहज पेलली. नंतर सलग 15 वर्षे त्यांनी युवक काँग्रेस च्या शहराध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.
हजारो बेरोजगारांना अर्थसहाय्य
रोटरी क्लब या जागतिक स्तरावरील सामाजिक संस्थेमध्ये ते कार्यरत राहून समाज सेवेचा वसा जोपासत आहेत. इतकेच नव्हे तर सामुदायिक विवाह सोहळा, मावळ नागरी सहकारी पतसंस्थाच्या माध्यमातून हजारो बेरोजगार लोकांना तातडीचे कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यास संतोष खांडगे यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले. तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे सभापती असताना सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वात जास्त शासकीय निधी आणून बारा वर्ग खोल्या बांधल्या तसेच प्रत्येक शाळेला दहा संगणक असे एकूण शंभर संगणक दहा शाळांना मिळवून दिले .
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे सचिव पदावर कार्यरत असून संस्थेच्या सर्व शाळांचा कायापालट मावळभूषण कृष्णराव भेगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहेत. समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठानची स्थापना करून त्या माध्यमातून अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी सदैव झटत असतात. एक पत्थर की भी तकदीर सँवर सकती है। शर्त ये है की सलीके से तराशा जाए।।
खूप काही सांगून जातो हा शेर. एखाद्या दगडाचे नशीब देखील बदलू शकते, अट फक्त एवढीच की त्याला योग्य पद्धतीने हाताळायला, घडवायला हवे. संतोषजींनी माणसे शोधली, जाणली,, हाताळली पारखली घडवली आणि जपली देखील. योग्य व्यक्ती पारखून त्यांना मानसन्मान, पदे त्यांनी बहाल केली… हे सारं करत असताना निरपेक्ष राहणे म्हणजे तारेवरची कसरत, परंतु त्यांना हे सहजसाध्य होतं, कारण हेतू स्पष्ट… साफ होता. यामुळेच औद्योगिक क्षेत्रातही त्यांनी गगनभरारी घेतली. सांपत्तिक प्रगती साधली परंतु त्याहीपेक्षा मोलाचं काय असेल तर त्यांनी माणसं कमावली. प्रेम.. दया.. करुणा.. जाणिवा अंगीकारून ते पुढे चालत राहिले. सर्व धर्म समभाव हे त्यांच्या आयुष्याचे अलिखित ब्रीद आहे.
स्वतः साठी जरी काही करता आलं नाही,तरी इतरांसाठी जगून बघावं. दुसऱ्याच्या डोळ्यातील आसवं पुसताना त्यात आपलंच प्रतिबिंब शोधावं
कोरोना या जगात ज्यावेळी थैमान घालत होता. त्यावेळी माणसापासून माणूस दुरावत चालला होता. नाती गोती, आपले परके सारे दूर धावत होते. अर्थात याला ही भयाचा थरकाप उठवणारी महामारीच होती. परंतु वरील ओळींप्रमाणे संतोषजी मात्र अशा भयाण परिस्थितीत देखील माणसांसाठी झटत होते. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विदारक काळात त्यांनी पवना शिक्षण संकुलाच्या वतीने ‘शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला. कोरोनाचे नियम पाळत गावात जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यात आले.
कर्तृत्वच माणसाला माणसात ठेवतं आणि मोठं करतं. आपल्या निर्मळ स्वभावानं आणि निर्व्याज वागण्यानं ते आमच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संस्था, पतसंस्था यावर ते विविध पदांवर कार्यरत आहेत आणि प्रत्येक पदाला ते न्याय देत आहेत. एवढं सगळं संभाळताना साधं राहणं सोपं नसतं पण संतोषजींना हे साधं राहणं सहज जमलं. अचूक निर्णय क्षमता, कार्यतत्परता व दूरदृष्टी आणि कार्य करण्यासाठी आवश्यक असणारा खळखळता उत्साह या सर्व बाबींवर त्यांची हुकूमत आहे. यामुळे ते कार्यरत असणाऱ्या प्रत्येक संस्थेची भरभराट उत्तरोत्तर झाल्याशिवाय राहणार नाही यात तिळमात्र शंका नाही. असे हे कुशाग्र बुद्धीची सेवा तत्पर धैर्यशील निर्भीड हजरजबाबी कर्तव्यनिष्ठ मितभाषी संयमी ज्यांच्या नसानसात समाजसेवा ओतप्रोत भरली आहे असे संतोष खांडगे ( Santosh Khandge ) समाजातील प्रत्येक घटकाची, राष्ट्राची सेवा त्यांच्या हातून घडत राहो. त्यांचे अष्टपैलूत्व बहरत राहो.. हीच अपेक्षा व्यक्त करतो.
आज त्यांच्या वाढदिवशी त्यांना सदोदीत निरामय…. उत्साहवर्धक आयुष्य लाभो आणि आपला स्वयंप्रकाशित तारारुपी चैतन्यमय प्रकाश कायम झळाळत राहो….. आपणांस वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना!
– मिलिंद शेलार (सर) सचिव, श्री. डोळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, तळेगांव दाभाडे



