*शिक्षण विभागाचा दुसरा घोटाळा*? शिक्षकांची टी. ए. आय. टी. चाचणी परीक्षा २०१७ चे रेकॉर्ड गायब करून पोर्टल बंद केले…..!

नांदेड – (सखाराम कुलकर्णी)माध्यमिक अथवा प्राथमिक शिक्षक होण्यास आवश्यक असलेल्या टी. ए .आय. टी. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २०१७ च्या परीक्षेचे रेकॉर्ड महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी गायब करून पोर्टल बंद केल्याची माहिती, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार प्राप्त झाली. यामुळे कित्येकांचे निकाल जाहीर झाले नसून ते उमेदवार शिक्षक नियुक्ती पासून वंचित राहत आहेत. अशा परीक्षा परिषदेच्या कारभारामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुन्हा दुसऱ्या घोटाळ्यात आहे की काय अशी चर्चा सर्वत्र होत आहे. केंद्रीय अधिसूचना दिनांक २३ -८-२०१० व २९- ७ -२०११ अन्वये निर्धारित केलेली किमान शैक्षणिक, व्यावसायिक पात्रतेसह केंद्र अथवा राज्य शासन द्वारा आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण पात्रताधारक व गुणवत्ताधारक उमेदवारच शिक्षकीय पदासाठी पात्र आहेत असा नियम आहे. या नियमानानुसार शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या परीक्षेचे आयोजन करते. पुढे माध्यमिक शिक्षकांसाठी टी. ए. आय. टी. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आयोजित केली. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २०१७ मध्ये झाली. या परीक्षेचे आयोजन सामान्य प्रशासन विभाग ( माहिती व तंत्रज्ञान) विभागाअंतर्गत महा आयटी यांचे मार्फत डिसेंबर २०१७ मध्ये घेण्यात आली होती. ही परीक्षा हजारो विद्यार्थ्यांनी दिली. पण त्यांचे पासचे प्रमाणपत्रात अद्याप देण्यात आले नाही. बरेच विद्यार्थी वाट पाहत होते. काही विद्यार्थी जिल्हा कार्यालयातील शिक्षण विभागात जाऊन चौकशी करत होते पण त्यांना शिक्षणाधिकारी दाद देत नव्हते .ही बाब जागरूक जेष्ठ पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते
सखाराम कुलकर्णी यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी या परीक्षेचे काही विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्राची मागणी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडे केली .येथील जन माहिती अधिकाऱ्यांनी सदरची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेकडे मिळते असे उत्तर देऊन सदरील चा माहितीचा अर्ज परीक्षा परिषद पुणे यांचेकडे वर्ग केला. सखाराम कुलकर्णी यांनी ही माहिती प्राप्त करण्याचा पाठपुरावा चालू ठेवल्यावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी असे कळवले की ही परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या महापरीक्षा पोर्टल द्वारे घेण्यात आली होती व सदर पोर्टल बंद केल्यामुळे कोणतीच माहिती उपलब्ध नाही. अशा उत्तरामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा हा दुसरा घोटाळा आहे की काय अशी शंका येत असून याचीही उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची शिक्षक पात्रता परीक्षा २०१९- २० मधील फार मोठा घोटाळा उघडकीस आला. अपात्र विद्यार्थ्यांचे गुण वाढवून त्यांना पात्र केले .असे ७८०० विद्यार्थी पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचे निष्पन्न झाले होते .या घोटाळ्यात मंत्रालयासह परीक्षा परिषद पुणे येथील बरेच वरिष्ठ अधिकारी अडकले आहेत. त्यात आयएएस अधिकारी सुशीलकुमार खोडवे, तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व प्रितीश देशमुख या प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे .या २०१९ -२० च्या शिक्षक पात्रता परिषदेत चा घोटाळा उघडकीस आला की टी. ए. आय. टी. २०१७ च्या परीक्षेचे रेकॉर्ड नाहीसे करून पोर्टल बंद केले. कारण यातील घोटाळे उघडकीस येऊ नये म्हणून परीक्षा परिषदेने ताबडतोब सदरील पोर्टल बंद केले असावे अशी शंका येत आहे. यासाठी या २०१७ च्या परीक्षेतील त्यांना न्याय मिळण्यासाठी या परीक्षेची चौकशी सायबर कडून करावी अशी होत आहे.