तालुक्यात पावसाअभावी भातलावणी खोळंबली
मावळ : जून महिन्यात दमदार हजेरी लावल्यानंतर तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला असून भात लावणी खोळंबली आहे.
ऐन हंगामात पावसाअभावी परिसरातील भातलावणी अडचणीत आली आहे. कडक उन्हाने भाताचे तरवे पाण्याअभावी कोरडे पडू लागले आहेत. मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने लावणीस विलंब होत आहे .भाताची लावणी करण्यासाठी पावसाची गरज असते.
आधीच कोरोना महामारी मुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी महागडे बियाणे, खते घेऊन पेरणी केली. त्यातच आता पाऊस नसल्याने शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी संकटात सापडला.
पाऊस असाच लांबला तर त्याचा फटका तरव्यांना बसू शकतो. तरवे पिवळे पडल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पाणी नसल्याने शेती कोरडी पडली आहेत.अशा परिस्थितीत आम्ही जगायचं कसं ? असा सवाल शेतकरी करीत आहेत.



