आपला जिल्हामहाराष्ट्र
जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी विद्यार्थ्यांना दिला यशाचा कानमंत्र; बीड जिल्हा व्यापारी महासंघाकडून गुणवंतांचा गौरव
बीड ः प्रतिनिधी दहावीचे यश हे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे कारण की या पॉईंटवर आयुष्याला एक महत्त्वाचं वळण लागतं. दहावी, बारावी मध्ये जास्त मार्क्स मिळाले म्हणजे सर्व काही मिळाले असे नाही तर स्पर्धेच्या जगामध्ये आता प्रत्येक क्षणाला स्वतःला सिद्ध करावे लागेल जो विद्यार्थी या सर्व क्षणांना या परीक्षांना तयार राहतो तो आपले ध्येय प्राप्त करतो असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले. बीड जिल्हा व्यापारी महासंघ बीड शहर व तालुकाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जॉन्सन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष भास्करराव जाधव, कार्याध्यक्ष अशोक शेटे, शहराध्यक्ष प्रकाश कानगावकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र बनसोडे, महासचिव तुकाराम साळुंके, सचिव गंगाबिशन करवा, शहरसचिव सुर्यकांत महाजन, तालुका सचिव बाळासाहेब तिवारी व वाय जनार्दन राव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष अशोक शेटे यांनी केले. ते म्हणाले, व्यापार करत असताना ज्या समाजाचे आम्हाला सहकार्य लाभते त्या समाजाला आम्ही काही देणे लागतो या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच व्यापारी जसा व्यवसायात मेहनत घेतो, येणार्या अडचणीवर मात करत व्यवसायात यशस्वी होतो तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यासात मेहनत घेऊन यशस्वी व्हावे असे सांगितले. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी आपल्या यशाचे रहस्य सांगतांना माझ्यात एक अभ्यासूपणा होता, पण ध्येय निश्चित केल्याशिवाय मी केलेल्या अभ्यासाचा फायदा होणार नाही म्हणून माझ्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनात मी ध्येय निश्चित केले. जे आज फलश्रूत झाले आहे. आपण कितीही मोठे झालो आणि कुठेही असलो तरी आपण आपल्या मातृभूमीला विसरता कामा नये. कारण ज्या मातीतून आपल्याला आकाशाला गवसणी घालण्याची शक्ती मिळाली त्या मातृभूमीला विसरून चालणार नाही तर त्या मातृभूमीसाठी आपल्याला विकासात्म कर्तव्याची जाणीव असली पाहिजे असेही जॉन्सन यावेळी म्हणाले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष भास्करराव जाधव यांनी महासंघाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. यावेळी जवाहरलालजी कांकरिया, मदनसेठ दुग्गड, सुशील खटोड, आसारामजी मानधने, मुकेश अग्रवाल, गंगाबिशनजी करवा यांची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन प्रकाश कानगावकर यांनी केले. यावेळी व्यापारी,पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
