ताज्या घडामोडी
शहराच्या विकासासाठी कोण सक्षम? अंबाजोगाईत नेतृत्वाबाबत व्यापक चर्चा
अंबाजोगाई | उत्तरेश्वर शिंदे.. अंबाजोगाई शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नेतृत्व बदलाची जोरदार चर्चा जनसामान्यांमध्ये पाहायला मिळत आहे. शहरातील नागरिकांमध्ये मुंदडा परिवाराच्या नेतृत्वाबाबत नाराजीचा सूर, तर दुसरीकडे संकेत भैया मोदी आणि राजकिशोर (पापा) मोदी यांच्या कार्यशैलीबद्दल सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे. अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की, गेली काही वर्षे राजकीय नेतृत्वाकडून शहरातील सर्वसामान्यांच्या समस्या अपेक्षेप्रमाणे सोडवल्या गेल्या नाहीत. सध्या शहर, आरोग्य सेवा, नगरपरिषद कामगारांचे प्रश्न, शासकीय कार्यालयातील अडथळे अशा अनेक मूलभूत प्रश्नांवर मोदी पिता-पुत्र सातत्याने जनतेत उतरून काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील व्यापारी, कामगार, तरुण आणि शेतकरी वर्गातील काही नागरिकांचे मत आहे की – “नेतृत्व तेच, जे संकटात मदतीला धावून येते,” आणि याच भूमिकेतून मोदी कुटुंबीयांचे सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्याउलट, सध्याच्या राजकीय नेतृत्वाविषयी काही वर्गातून दूर राहणारे, स्थानिक प्रश्नांवर सक्रिय न दिसणारे अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात नगरपरिषद आणि शहराच्या नेतृत्वात बदल व्हावा, अशी भावना काही नागरिकांतून व्यक्त होत आहे. नुकत्याच शहरातील काही सामाजिक आणि संवेदनशील घटनांवरही नेतृत्वाची भूमिका अपेक्षित होती अशी चर्चा सामान्य जनतेत रंगत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या, नुकसान भरपाई, प्रशासकीय निर्णय या विषयांवर नेत्यांकडून प्रत्यक्ष मैदानात उतरून संवाद साधण्याची गरज असल्याची भूमिकाही नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरातील विविध भागातील नागरिकांच्या मतानुसार, अंबाजोगाईचा चेहरा बदलण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यरत, लोकांसोबत सतत राहणारे नेतृत्व आवश्यक आहे, आणि म्हणूनच मोदी कुटुंबाच्या दिशेने जनमत झुकत असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.




